अहमदनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा
नगर । वीरभूमी - 14-Jun, 2023, 01:08 PM
अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, भालेराव यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घ्यावे तसेच कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे. अकार्यक्षम ठरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील सकल बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, सोमा शिंदे, संजय कांबळे, बंटी भिंगारदिवे, योगेश साठे, नाथा अल्हाट, नगरसेवक राहुल कांबळे, बंडू आव्हाड, विवेक भिंगारदिवे, सागर ठोकळ, प्रा. जयंत गायकवाड, नितीन कसबेकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
निवेदनात म्हटले की, नांदेड येथील बोंडार गावातील अक्षय भालेराव यांची हत्या करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा गावात साजरी केल्याचा राग मनात धरून गावातील समाजकंटकांनी संगनमताने अमानुषपणे ही हत्या केली तसेच कुटुंबियाला देखील मारहाण केली. डॉ आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून मारेकर्यांना एवढा द्वेष का? जातीय व धार्मिक द्वेष पसरून शांतता भंग करण्याचा जातीयवादी शक्तींकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे देशात व राज्यात अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्थिर असल्यामुळे सरकारचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. महागाई, बेरोजगारीमुळे तरुणांच्या हाताला काम नसून रोजगार मागू नये म्हणून जातीयतेचे व धार्मिकतेचे राजकारण वेगाने सुरू झाले आहे. 16 ते 23 वर्षे वयोगटातील निरागस मुले धर्माच्या अफुला बळी पडून दंगलीत पुढाकार घेऊन दगडफेक करतात. पोलिसांच्या कारवाईत हे तरुण सापडतात. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात केंद्र सरकार विषयी उद्रेक निर्माण झालेला आहे. जातीय, धार्मिक भडकावू भाषणे करणार्या व्यक्तींवर कारवाई करावी. देशातील महागाई कमी करून घोषणा केल्याप्रमाणे दोन कोटी नोकर्या देण्यात याव्यात. अकार्यक्षम ठरलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने तत्काळ राजीनामा देण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
Comments