पाथर्डी । प्रतिनिधी- 05-Mar, 2025, 01:40 PM
श्रीक्षेत्र मढी येथे यात्रेनिमित्त कानिफनाथांच्या संजीवनी समाधीला पारंपारीक पद्धतीने तेल लावण्यात आले. अखंड मंत्रोच्चारात, नगरा, शंख ध्वनीच्या निनादात तेल लावण्याचा सोहळा उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. नाथांच्या जयजयकारात झालेल्या विधीमुळे गडावरील वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी हजारो भाविक, देवस्थानचे विश्वस्त, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.
मढी यात्रा उत्सवानिमीत्त मंगळवारी सायंकाळी 4 वाजता प्रथमता देवस्थान समीतीचे पदधिकारी व ग्रामस्थ यांनी कानिफनाथांच्या चांदीच्या पादुकाची पुजा करुन तेल लावण्याच्या विधीस सुरवात केली. यावेळी मढी देवस्थानचे कोषाध्यक्ष बबन मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे, शिवजित डोके, विश्वस्त भाऊसाहेब मरकड, शामराव मरकड, डॉ. विलास मढीकर, ग्रामस्थ अशोक महाराज मरकड, लक्ष्मण महाराज मरकड, भाग्येश मरकड, रमाकांत मडकर, बाला मरकड, कालीदास घोडके, नवनाथ मरकड, सुरेश मरकड, माऊली मरकड, दिनेश जोशी आदी उपस्थीत होते.
शुद्ध पंचमीला नाथांच्या समाधीला तेल लावण्याचा विधी असतो. कुंभाराकडुन मातीचे कोळंबे व पाच घट आणले जातात. त्यास नाडा बांधुन त्यामध्ये तेल टाकले जाते. गुलाबपाणी, दुध, गंगाजल, हळद, चंदन पावडर, बुक्का, भस्म असे पदार्थ कालवुन नाथांच्या संजीवनी समाधीला तेल लावण्याचा पारंपारीक विधी केला जातो.
तेल लावण्याची शेकडो वर्षाची परंपरा असुन प्रत्येक देवतांच्या उत्सवा पुर्वी शुभ व धार्मीक कार्याचा प्रारंभ तेल लावण्यापासुन होतो. समाधीसह उत्सव मुर्तीना थंडावा राहुन सुगंधी द्रवाने तैलाभ्यंग होऊन केली जाणारी पुजा यात्रेची लगबग वाढवणारी ठरते. तेल लावल्यानंतर आजपासुन गुढीपाडव्या पर्यंत मढी ग्रामस्थ व्रतस्थ असतात. आजपासुन घरात गोड पदार्थ नाही, विवाह कार्य नाही, शेतीची कामे बंद, दाढी कटींग, नवीन वस्त्र परिधान नाही.
येवढेच नाहीतर स्वतःच्या घरात मंगल कार्य करत नाहीत. हा संपुर्ण यात्रा कालावधी भाविक व यात्रेकरूंच्या सेवेसाठी राखीव ठेवला जातो. अन्य ठिकाणी यात्रा काळात देवाला तेल लावले जाते. मढी येथे मात्र देवाला तेल लावल्यानंतर ग्रामस्थ व्रतस्थ राहतात. पूर्वीपार चालत आलेली परंपरा असून त्यानुसार आज हा विधी पार पडला. यात्रेसाठी कानिफनाथांच्या उत्सवाची तयारी करता यावी व मंदिराचे नियोजन, सोयी सुविधा बाबत पुरेसा वेळ मिळावा म्हणुन मढी ग्रामस्थ या गोष्टी करत नाहीत.
7z47pq