Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज

नागपूरचे माजी आ. आशिष देशमुख यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र

 मुंबई । वीरभूमी - Jan 17, 2023 • 04:12 PM 1830 views

नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीच्या घोळाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच जबाबदार आहेत. असा आरोप करत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज आहे. अन्यथा राज्यात काँग्रेस पाचव्या स्थानावर जाईल अशी भीती नागपूरचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

या मागणीसाठी देशमुख यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठविले आहे. त्यांनी पाठविलेल्या पत्रात सत्यजीत तांबे यांच्या घोळाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याचे म्हटले आहे. देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल पत्र जश्याचे तसे पुढील प्रमाणे.

मा. महोदय, आपल्या नेतृत्वात काँग्रेस प्रगतीच्या अपेक्षेत आहे. एकेकाळी काँग्रेस देशाचा एक प्रमुख पक्ष होता. खरे म्हणजे, काँग्रेस हा नुसता राजकीय पक्ष नसून एक विचार आहे, एक चळवळ आहे. काँग्रेससारखी परंपरा इतर कोणत्याही पक्षात दिसत नाही. एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय, अशी परिस्थिती मागील काही वर्षांपासून उत्पन्न झाली आहे. आपला कॉग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करतांना दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे.

शेतकरी, कामगार, आदिवासी, युवा वर्ग, महिला, शोषित, पिडीत, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी, महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी 2021 मध्ये श्री. नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशिलीमुळे हा बालेकिल्ला आता काँग्रेसच्या हातातून निसटला आहे, हे सर्वश्रुत आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री. नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची दाणादाण उडत आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसची वाताहत सुरु झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा जबरदस्त विजय झाला.

जून 2022 मध्ये विधान परिषद निवडणूकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एक चे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली, त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला. 4 जुलै 2022 ला शिंदे- फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्वाची होती. पण काँग्रेसचे तब्बल 10 आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतांनासुद्धा अनेकांनी पक्ष विरोधी काम केलं.

या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिले होते, त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आले नाही. सर्व बाजूंनी काँग्रेस सपशेल तोंडघाशी पडली आहे. सत्ता गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी एकसंघ आहे, हे चित्र खोटे ठरले आहे. जर भाजपने पाठींबा दिलेले सत्यजित तांबेसारखे अपक्ष उमेदवार पाचही जागेवर निवडून आले तर विधान परिषदेच्या सभापती पदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रात बेबंदशाही आहे, असे म्हणायलाही आता काही अर्थ उरलेला नाही.

राज्यात पक्ष पहिल्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावरही जाईल. पक्षात शिस्त नाही. मुळात पक्षाच्या विचारधारेवरही नेत्यांच्या मनात आदर नाही. एकीकडे राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत, पण स्थानिक काँग्रेस नेत्यांना मात्र पक्षापेक्षा स्वतःच्या सत्तेची पडलेली आहे. अशा काँग्रेस विरोधी घटना घडत असतांना प्रदेश काँग्रेस अध्यक्षांमध्ये कारवाई करण्याची धमक उरलेली नाही. तसे केल्यास पक्षात कोण उरेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे. ज्या काँग्रेसची पाळेमुळे शहरांपासून तर ग्रामीण भागांपर्यंत रोवली गेली होती त्या पक्षाकडे कार्यकर्तेच उरले नाहीत. म्हणजेच पक्षाचा कणा उरलेला नाही.

पक्षांतर्गत गटबाजी हा मोठा प्रश्न राज्यातील काँग्रेससमोर उभा ठाकला आहे. संघटनेची घडी विस्कळीत झालेली आहे. आज संघटनेमध्ये चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे. चैतन्य निर्मितीसाठी श्री. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुण वर्गाची गर्दी बघता एका नव्या वर्गाला काँग्रेस जवळची वाटत आहे. कॉग्रेसपासून दुरावलेली माणसे जोडण्याचे काम श्री. राहुल गांधीकरीत आहेत. परंतु, हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तीत करण्यासाठी ठोस रणनीती प्रदेशाध्यक्षना कितपत जमेल, ही शंका आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष आजच्या घडीला सक्षम नेतृत्व नसणारा पक्ष म्हणून दिसत आहे.

विविध निवडणुकींमध्ये सतत होणारे पराभव असण्याचे कारण म्हणजे पक्षाची असलेली दयनीय अवस्था आहे. या पक्षात नेते उरले आहेत परंतु कार्यकर्ते नाहीत. राज्यात या पक्षाचा चेहरा गेल्या अनेक वर्षांपासून बदलला नाही. गेली अनेक वर्षे त्याच त्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. तळागाळातील कार्यकर्ते यामुळेच पुढे जाऊ शकले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. नवे चेहरे क्वचितच दिसत आहेत. परिणामी राजकीय करिअरसाठी कॉग्रेस विचारसरणीचे लोकं इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉग्रेस असे अनेक पक्ष राज्यात प्रभावशाली होत आहेत. श्री. राहुल गांधी यांची यात्रा आणि इतर माध्यमांतून तसेच काँग्रेसाध्यक्ष म्हणून आपल्या मदतीने कॉग्रेस पक्षाची पुनर्बांधणी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु, महाराष्ट्राचे काय, हा प्रश्न तसाच कायम राहतो. महाराष्ट्रातील काँग्रेसचे भविष्य हे महाराष्ट्रातील लोकांच्या हातात आहे.

काँग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करावे लागणार आहे. नेते व कार्यकर्ते पुन्हा नक्कीच जुळतील पण त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिर्षत्व नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणजेच महाराष्ट्र प्रदेशातील नेतृत्व हे सक्षम असणे गरजेचे आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात कॉग्रेसची स्थिति सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काल बदलण्याची नितांत गरज आहे. प्रदेशाध्यक्ष असा असावा, जो महाराष्ट्राच्या गावां-गावांत फिरून जनतेचे प्रश्न उचलून त्यांस वाचा फोडेल आणि कॉग्रेसची स्थिति मजबूत करेल. काँग्रेसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या पत्राची गंभीर दाखल घ्यावी, अशी नम्र विनंती मी आपणांस करीत आहे.

धन्यवाद.. आपला विश्वासू, डॉ. आशिषराव र. देशमुख माजी आमदार (नागपूर), सदस्य, पार्लमेंटरी बोर्ड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply