पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना दिला दिलासा । नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे अतिरिक्त मदतीची मागणी
मागील दोन दिवसांत पाथर्डी तालुक्यात झालेल्या अवकाळी अतिवृष्टीने ढगफुटीचे चित्र निर्माण झाले. यापूर्वी कधीही न झालेला असा पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेती, जनावरे व घरांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समोर यायला वेळ लागेल, मात्र स्थायी आदेशानुसार तातडीची मदत देण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत. अतिरिक्त निधीची गरज असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मदतीची विनंती करणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील ४९ हजार हेक्टर क्षेत्रावरील तब्बल ६९ हजार शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, ३४ गायी, २५० कोंबड्या, २५ शेळ्या, ५० करडे वाहून गेले. याशिवाय २६ घरांची पडझड झाली. देवळाली नदीत राजू शिवाजी सोळंके (३९) व टाकळी मानूर तलावात गणपत हरीभाऊ बर्डे (६५) हे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, नदी-नाले-ओढ्यांच्या प्रवाहात बदल व अतिक्रमण हे मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरले. भविष्यात अशी आपत्ती टाळण्यासाठी पावसाळ्यानंतर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने वेळेत उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. नुकसानग्रस्त घरांसाठी मदत किंवा घरकुल योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे. स्थलांतरितांना अन्नपॅकेटचे वितरण करण्यात आले आहे.
सरसकट पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून अंतिम आकडेवारी लवकरच स्पष्ट होईल. मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यासाठी अतिरिक्त मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली जाईल, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, करंजी, तिसगाव, कासार पिंपळगाव आदी गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे, सायली पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.